युवक मित्रांनो, आपले पारंपारिक शिक्षण हे आपल्याला पायावर उभे करते, पण जीवनात खऱ्या अथनि चालायला शिकवत असतील तर ती आपली विविध जीवनविषयक व्यवस्थापन कौशल्ये होत. शिक्षण हा फक्त जीवनाचा पाया आहे, तर या शिक्षणाच्या पायावर युवक जोपर्यंत विविध जीवनविषयक व्यवस्थापन कौशल्यांच्या भिंती बांधत नाहीत तोपर्यंत त्यांचे जीवनरूपी घर पूर्णत्वास घेऊन जाऊ शकत नाही. पारंपारिक शिक्षण घेतले! आता सर्व शिक्षण संपले, आता आपल्याला नवीन काहीही शिकण्याची आवश्यकता नाही हीच वृत्ती आजच्या युवकांचा घात करते. शिक्षणाने माणूस शहाणा होत असला तरी तो व्यवहारी व यशस्वी होतोच असे नाही. एकंदर स्पर्धेच्या या युगात शिक्षणासोबतच किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावरही युवकांनी विविध जीवनविषयक कौशल्ये हस्तगत करत राहिले पाहिजेत. जीवनविषयक व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करणे ही एक आयुष्यभर चालणारी निरंतर प्रक्रिया आहे हेही लक्षात घ्यावे. मात्र युवकांनी नक्की कोणती कौशल्ये हस्तगत करावी, याबाबत त्यांच्यामध्ये संभ्रम दिसून येतो. युवकांनी आयुष्याच्या खडतर आणि संघर्षपूर्ण प्रवासात खालील अकरा कौशल्ये कशा प्रकारे आत्मसात करून वृद्धिंगत करावीत, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात करण्यात आलेला आहे.
१. आकलन कौशल्ये (Cognitive skills): आकलन कौशल्ये ही अत्यंत प्राथमिक आणि पायभूत कौशल्ये आहेत. एखादी वस्तू, बाब, घटना, समस्या याची आपल्या मेंदूला माहिती मिळणे आणि त्या आधारे अर्थबोध होणे म्हणजे आकलन होय. योग्य आकलन होण्यासाठी वस्तू, बाब, घटना, समस्या ह्या अत्यंत बारकाईने समजून घ्याव्या लागतात. "जिज्ञासू वृत्ती" ही आकलन कौशल्ये वाढीसाठी पूरक काम करते. त्यामुळे युवकांनी नेहमी विविध बाबी आणि घटना जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. बऱ्याच वेळा युवक काही बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात, तसे केल्याने बऱ्याच आजूबाजूला चाललेल्या गोष्टींचे ज्ञान त्याला होत नाही आणि त्यामुळे तो मागे राहून जातो. सर्व युवा मित्रांनो, सर्व गोष्टी डोळसपणे पाहायला शिका आणि त्यावर काम करून पुढे जा.
२. महितीचा अर्थ लावणे कौशल्ये (Interpretation Skills): सोशल मीडियाच्या या जगात युवकांच्या पुढे अनेक प्रकारची चांगली व वाईट माहिती समोर येत असते अथवा उपलब्ध होत असते, माहितीचा भडीमार झाल्याने आजचे युवक माहितीचा अर्थ न लावता व तिचा खरेपणा न तपासता ती शेअर करत असतात हे अत्यंत धोकादायक आहे. उपलब्ध झालेल्या माहितीचा अर्थ लावणे आणि ती बरोबर आहे की चूक याबाबत खात्री करणे हे कौशल्य युवकांकडे असायलाच हवे. मात्र यासाठी सखोल वाचन आणि विस्तृत चर्चा आवश्यक असते तरच आपण माहितीचा अर्थ लावू शकतो. नाहीतर माहितीचा अर्थ एक असतो आणि आपण वेगळाच काढतो. त्यामुळे युवकांच्या पुढील वाटचालीत अडचणी निर्माण होतात. सबब प्राप्त माहिती युवकांनी विवेकबुद्धी वापरून हाताळावी आणि त्यातून स्वतःचा विकास साधावा.
३. विश्लेषणात्मक क्षमता कौशल्य (Analytical Ability Skills): आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. घडलेली घटना अथवा निर्माण झालेली समस्या याचे विश्लेषण करता येणे आणि त्या आधारे उपाययोजना करणे किंवा कामाची दिशा ठरवणे आवश्यक असते. यासाठी युवकांच्या अंगी विश्लेषणात्मक कौशल्ये असणे आवश्यक असते. मात्र या कौशल्यासाठी युवकांकडे योग्य अशी तीक्ष्ण निरीक्षण क्षमता आवश्यक असते. आजूबाजूला काय घडतेय या बाबत लक्ष असायलाच हवे तरच विश्लेषण करता येते. विश्लेषण हे ज्ञान आधारित असते त्यामुळे यासाठी खोलवर व विस्तृत वाचन करावे लागते. युवकांनी यासाठी अवांतर वाचन करण्यावर भर द्यावा.
४. तार्किक कौशल्य (Logical Reasoning Skills): घडलेल्या घटनेचा अर्थ लावणे, भविष्यात काय होऊ
शकेल याचा तर्क लावणे, एखादा असा का बागतो याचा तर्क लावणे, हे असेच का घडले याचा तर्क लावणे, हे सर्व तार्किक कौशल्ये यात येते. तार्किक कौशल्ये हे एखाद्या व्यक्तीवर आणि घटनेवर योग्य नियंत्रण प्राप्त करणे यासाठी आवश्यक असते. मात्र तर्क बांधण्यासाठी ज्ञान व अनुभव याचा योग्य समन्वय साधावा लागतो हे विसरता कामा नये. त्यासाठी पूर्वग्रहदूषितपणाने जे तर्क लावले जातात त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. सबब तर्क बांधण्यासाठी युवकांनी योग्य माहिती घेऊन आणि तिचे विश्लेषण करून पुढे जावे.
५. निर्णय क्षमता कौशल्य (Decision Making Skills): निर्णय क्षमता ही अत्यंत महत्त्वाची क्षमता आणि कौशल्य
असून त्या आधारे योग्य वेळी आणि अचूक निर्णय घेऊन विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर स्वार होता येते. काही लोक निर्णय घेतच नाहीत किंवा निर्णय घेतला तर तो खूप उशिरा घेतात. त्यामुळे ते पुढे मार्गक्रमण न करता, आहे तेथेच राहून जातात. निर्णयक्षमतेसाठी युवकांकडे ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव याचा तिहेरी संगम आवश्यक असतो. नुसते ज्ञान किंवा नुसते कौशल्ये असून भागत नाही तर त्याला अनुभवाचीसुद्धा जोड आवश्यक असते. त्यामुळे ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव यांआधारे निर्णय क्षमता कौशल्ये युवकांनी वृद्धिंगत करावीत.
६. नेतृत्व आणि संघटन कौशल्ये (Leadership and Team Building Skills): आयुष्यात आपण अनेक
ठिकाणी एकत्रित प्रयत्न आणि कामे करत असतो. मात्र अशी एकत्रित कामे ही फलदायी ठरणेसाठी योग्य टीम तयार होणे आणि योग्य व्यक्तीने नेतृत्व करणे अपेक्षित आणि आवश्यक असते. त्यासाठी युवकांनी संधी मिळेल तेथे नेतृत्व करायला हवे. संघटन कौशल्ये साधण्यासाठी समूहाला योग्य रीतीने हाताळावे लागते. नेतृत्व आणि संघटन कौशल्ये वृद्धिंगत केली की युवक हळूहळू नेतृत्वक्षम होतात. नेतृत्व मिळाले की लोक युवकांचा आदर करायला सुरुवात करतात आणि त्यातूनच युवकांचा विकास सुरू होतो.
७. समन्वय आणि सहकार्य कौशल्ये (Coordination and Cooperation skills): विकास आणि प्रगती साधायची असेल तर युवकांना त्यांच्या सभोवतालचे विविध घटक यांच्याशी समन्वय आणि सहकार्य करावे लागते, समन्वय आणि सहकार्य हे एका बाजूने कधीच होत नाहीत त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न आवश्यक असतात. योग्य नियोजन असले की समन्वय साधला जातो. सहकार्य हे मात्र परस्परपूरक असते. त्यामुळे युवकांनी जाणीवपूर्वक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला
पाहिजे आणि सहकार्य वृद्धिंगत केले पाहिजे.
८. अंतर वैयक्तिक संबंध कौशल्य (Interpersonal Skills): आपण एका विशिष्ट आणि विकसित अशा समाजाचे घटक आहोत, त्यामुळे साहजिकच एकटे राहून आपले आयुष्य जगू शकत नाही. अनेक वेळा आपण ऐकतो की "मला कोणाची गरज नाही", असे वागणे आणि बोलणे म्हणजे आपली मानसिक आत्महत्या आहे. समाजातील विविध घटकांसोबत युवकांना संयोजन, समयोजन, समन्वय आणि सहकार्य करावेच लागते. दैनंदिन जीवनामध्ये वावर जेथे असतो, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अंतर वैयक्तिक संबंध कौशल्ये विकसित करायला लागतात. कोण आणि कुठला व्यक्ती कधी कामाला अथवा मदतीला येईल हे सांगता येत नाही.
९. संभाषण कौशल्य (Communication Skills): संवाद आणि संभाषण हा मानवी उत्क्रांती आणि विकासाचा
पाया आहे. योग्य आणि अचूक संभाषण युवक साधत असतील तर कामे लवकर होतात आणि लोक युवकांचा आदर करायला सुरुवात करतात. तसेच योग्य आणि स्पष्ट संवादाने युवक लोकांची मने जिंकू शकतात. त्यासाठी जाणीवपूर्वक युवकांनी संवाद हा स्पष्ट आणि अचूक कसा होईल याकडे लक्ष पुरवायला हवे. तसेच संवाद आणि संभाषणाने जाणीवपूर्वक कोणी दुखावले जाणार नाही याचीही दक्षता युवकांनी घ्यायला हवी.
१०. समस्या सोडवणूक कौशल्ये (Problem Solving Skills): जीवनात पदोपदी अनेक समस्या येत असतात. या
समस्या जर उग्र रूप धारण करत असतील तर जीवनविषयक विकासात अडथळा आणि प्रगतीत खंड निर्माण होतो. वास्तविक जगात कोणत्याही समस्येचे निराकरण असतेच, फक्त योग्य मागनि ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असते आणि त्यासाठी समस्यांच्या मुळाशी जावे लागते. समस्यांचे योग्य पद्धतीने विश्लेषण केल्यास समस्यावर उपाय सापडतात. एखादी समस्या लहान असते मात्र तिच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ती अधिक मोठी आणि गुंतागुंतीची होते, त्यासाठी अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये युवकांनी त्यावर उपाय शोधला पाहिजे आणि ती समस्या सोडवली पाहिजे.
११. माहिती तंत्रज्ञान कौशल्ये (Information Technology Skills): आजचे युग हे संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन
आणि सोशल मीडियाचे आहे. त्यामुळे याबाबतचे किमान कौशल्य युवकांनी हस्तगत करण्याशिवाय तरणोपाय नाही. आज
अगदी प्रवास ते खरेदी ह्या गोष्टी सुद्धा ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे ह्या बाबी युवकांना टाळून चालणार नाहीत तर त्या शिकून घ्याव्या लागतील. म्हणून आज प्रत्येकाने याबाबत मागे न राहता पुढे जावे आणि माहिती तंत्रज्ञान कौशल्ये हस्तगत करावीत.
एकंदर शिक्षण तर महत्त्वाचे आहेच, मात्र या शिक्षणासोबत वरील अकरा जीवनविषयक कौशल्ये युवकांनी हस्तगत करणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या जोडीला ही कौशल्ये असतील तर युवकांची प्रगती आणि विकास हा जलद गतीने होतो. चला ही कौशल्ये अंगी रुजवूया आणि यशस्वी होऊया।